खा.सोनवणेंनी पुसले अतिवृष्टीग्रस्तांचे अश्रू; म्हणाले, शेतकऱ्यांसाठी पीकविमा कंपनीशी मी भांडतो…
बीड, माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद, शेतजमीनी अन् पिकांचे प्रचंड नुकसान
बीड: बीड जिल्ह्यातील ६१ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली अूसन नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.सदरील अश्रू पुसण्यासाठी दि.५ सप्टेंबर रोजी खा.बजरंग सोनवणे यांनी माजलगाव, बीड तालुक्यातील विविध भागातील शेतात जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसले. यावेळी खा.सोनवणे यांनी, माझ्या शेतकऱ्यांचे अगणित नुकसान झाले असून आता सरकारने ऑनलाईन नोंदी आणि पंचनाम्याच्या भानगडीत न पडता सरसकट मदत करावी, पीक विमा कंपन्यांकडून मदत मिळवून देण्यासाठी मी कंपनीशी भांडतो, तुम्ही निश्चींत रहा, असा शब्द शेतकऱ्यांना दिला.
जिल्ह्यात सलग दोन दिवस संततधार पाऊस झाला. यात ६१ महसूल मंडळात अतिवृष्टींची नोंद असून सखल भाग असलेल्या शेतीत चार दिवसांनंतरही पाणी साचलेलेच आहे.शिवाय नदीच्या पुराने जमीनी खरडून गेलेल्या असून यात शेतात केलेल्या पाईपलाईन देखील वाहून गेलेले आहेत. शेतातील नुकसान पाहण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी शेतकरीपुत्र खा.बजरंग सोनवणे यांनी दि.५ रोजी सकाळी नुकसान पाहणी दौऱ्यास सुरूवात केली.सादोळा (ता.माजलगाव) येथे शेतात पाहणी करतेवेळी शेतकऱ्यांनी अक्षरश: चिखलात लोळलेले पिक हाती घेवून दाखविले. पुढे पुरूषोत्तमपुरी, गव्हाणथडी येथे भेट देवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कृषी विभागाचे कर्मचारी, पीक विमा कंपनीचे कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. यावेळी खा.सोनवणे यांनी संबधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना मदत कशी मिळवून देता येईल, यासाठी सहकार्य करा, अशा सुचना केल्या.तर बीड तालुक्यातील म्हाळसापूर, खांडेपारगाव येथे पाहणी करताना, आम्हाला सरसकट मदत मिळवून द्या अशी मागणी केली. यावेळी खा.सोनवणे यांनी पीक विमा कंपनीकडून मदत मिळवून देण्याच्या दृष्टीने जे जे करता येईल ते करू, वेळप्रसंगी कंपनीशी भांडण करायची वेळ आली तरीही मी करेल पण शेतकऱ्यांना मदत मिळवूनच देईल, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
००
अचानक दिली अंगणवाडीला भेट
ग्रामीण भागात शेतकऱ्यांची मुले अंगणवाडी मध्ये शिकत असतात. त्यांना चांगल्या सुविधा मिळतात की नाही, हे पाहण्यासाठी खा.बजरंग सोनवणे यांनी पुरूषोत्तम पुरी अंगणवाडी दिसताच अचानक गाड्यांच्या ताफा थांबविण्यास सांगितले. यावेळी अंगणवाडीतील मुले भात खात होती. खा.सोनवणे यांनी अंगणवाडीत जात भाताची पाहणी केली. अंगणवाडीमध्ये शेतकऱ्यांचीच लेकरं आहेत, त्यांना दर्जेदार सुविधा देण्याच्या सुचनाही केल्या. इतिहासात प्रथमच खासदाराने अंगणवाडीला भेट दिल्याचे हे उदाहरण होते.
००
...तर कृषीमंत्र्यांचा सत्कार करेल
माजलगाव तालुक्यात नुकसानग्रस्त पीकांची पाहणी करत असताना माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे आणि इतर गोष्टी न करता बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळवून देत असल्याचे म्हटले आहे, यावर काय सांगाल, असे विचारले असता, खा.सोनवणे यांनी सरकार असे करेल असे वाटत नाही. सरकारने जनतेला आजवर दिलेले कोणतेही शब्द पाळलेले नाहीत. आता कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तो शब्द पाळला तर शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचा सत्कार करेल, असेही म्हटले.