बंजारा समाजासाठी सुवर्णसंधी: संजयभाऊ राठोड यांची शिष्यवृत्ती योजना ३.०”:- विलास चव्हाण
मुंबई :१० ऑगस्ट राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा बंजारा भूषण संजयभाऊ राठोड यांच्या संकल्पनेतून “मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती योजना ३.०” राज्यभर राबवण्यात येणार आहे. बंजारा समाजातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ही योजना एक सुवर्णसंधी ठरणार आहे. या योजनेंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या १००० विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, दर्जेदार अभ्यास साहित्य आणि ऑनलाइन मार्गदर्शन मोफत दिले जाणार आहे.
या योजनेचे यापूर्वी दोन टप्पे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा क्षेत्रात यशस्वीरीत्या राबवले गेले होते. प्रत्येकी २०० विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत संधी देण्यात आली होती. या विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य प्रशासनातील विविध पदांवर प्रवेश मिळवून स्वतःचं आयुष्य घडवले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी वाट दाखवली आहे. त्यामुळे आता ही योजना राज्यव्यापी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाणार असून परीक्षा केंद्र, दिनांक आणि वेळ याची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नोंदणी प्रक्रिया ७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असून २० ऑगस्ट २०२५ पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची संधी असेल. यासाठी एक ऑनलाइन फॉर्म उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
संजयभाऊ राठोड साहेब हे केवळ बंजारा समाजापुरते मर्यादित न राहता राज्यभरातील तरुणांच्या भविष्यासाठी काम करत असून, “समाजाचं आपण देणं लागतं” या भावनेतून १०००(एक हजार)विद्यार्थ्यांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. समाजासाठी झटणारा, गरजूंना साथ देणारा आणि प्रत्येक कार्यात खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून संजयभाऊ राठोड साहेब यांचं नाव राज्यभर गाजत आहे.
या शिष्यवृत्ती योजनेमुळे अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर होणार असून, त्यांना स्पर्धा परीक्षांमधून यश मिळवण्याची मोठी संधी मिळणार आहे. त्यामुळे बंजारा समाजातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या स्वप्नांना उंच भरारी द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे आसे विलास चव्हाण यांनी सांगितले आहे…!